माणसातल्या माणुसकीचा ऱ्हास ....
लेखक:कांबळे गौतमकुमार नागनाथराव
मुख् संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : आज आपण 21 व्या शतकात जगत असताना मानवाने खूपच वैज्ञानिक प्रगती केली. माणूस चंद्रावर तर पोहोचलाच पण विश्वातील इतर ग्रहा पर्यंत ही लवकरच पोचवण्याची वाटचाल चालू आहे. विश्वामध्ये एक महासत्ताक भारत म्हणून ओळख निर्माण होत आहे याचा आपणास भारतीय म्हणून अभिमान आहेच पण आज पर्यंत आपल्या देशातील सर्वात अगोदर वैचारिक क्रांती ही महाराष्ट्रात झाली. देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते त्याचे कारणही असेच आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती केली. विषमतावादी समाज रचनेला हादरे देऊन विषमता नष्ट करून सामाजिक समता भारतीय राज्यघटनेच्या द्वारे प्रस्थापित केली. त्याही अगोदर विविध साधुसंतांनी सुद्धा अंधश्रद्धा व बुवाबाजीवर प्रखर हल्ले केले व हे करत असताना त्यांनी मानवी मूल्यांची, सुसंस्कारांची रुजवणूक केली.
संतांनी माणसात देव शोधला व दिन दुबळे, अपंग यांना मदत करणे म्हणजेच ईश्वर सेवा अर्थातच माणूस सेवा हाच धर्म सांगितला. लोकांवर त्यांचा प्रभाव राहिला लोक शिक्षणांनी अशिक्षितांचे प्रमाण जरूर जास्त होते पण आजच्या शिक्षितानाही लाजवील अशी त्या काळात माणुसकी होती.
पूर्वीच्या काळी मोठ-मोठे दुष्काळ जेव्हा पडत तेव्हा माणसाला
जगविण्यासाठी आपल्या घासातला घास लोक
गोरगरिबांना देऊन त्यांचा जीव वाचवत असत पण आजची परिस्थिती पाहिली तर कोणत्याही सुज्ञ संवेदनशील माणसांचे मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. आपण काय कमवत आहोत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाची माणुसकीच गमावत आहोत.
गेल्या चार-पाच दिवसा अगोदर न्यूज चैनल वर एक बातमी पाहिली तेव्हापासून डोक्यात अनेक विचारांचे वादळ निर्माण झाले आहे. मन अस्वस्थ झालेले आहे. मुंबई पश्चिम उपनगर वसईत काळी वर्दळीच्या रस्त्यावर एक माथेफिरू कामावर निघालेल्या पूर्व आश्रमीच्या प्रियसीला गाठतो आणि तिची हत्या करतो. तो ही कृती करत असताना त्या ठिकाणी बरीच माणसे होती पण एकही पुढे येऊन त्या मुलीचा जीव वाचवू शकला नाही. हाच का तो महाराष्ट्र ? आपण कोणत्या तोंडाने महापुरुषांची नावे घेतो व त्यांचा जयजयकार करतो ? आपली लायकी तरी आहे काय ? जय शिवरायांनी महिलांचा आदर सत्कार केला. जय शिवरायांचे आपण मावळे म्हणतो तेव्हा आपल्या अंगात अन्याय अत्याचाराविरुद्ध रक्त उसळायला पाहिजे पण आज आपले रक्त गोठली की काय? महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण महाराष्ट्रवासी सर्वजण अनुयायी असताना, अन्याय अत्याचार समोर होताना आपण सामूहिकरीत्या दोन-चार जण तरी पुढे येऊन त्या नराधमाला विरोध करून अडवले असते तर एका बहिणीचा जीव वाचला असता पण लाजिरवाणी गोष्ट अशी की बरेच जण त्यावेळेस मोबाईल मध्ये या
घटनेचे चित्रीकरण करत होते.
आपल्या राज्यात, देशात, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त कोण आहे ? त्याची जात व धर्म कोणता यावरून त्याला न्याय मिळविण्यासाठी आंदोलने होतात. एखादी अन्यायग्रस्त व्यक्ती ही अति मागास व संख्येने अत्यल्प असलेल्या जात समूहातील असेल तर त्या अत्याचार ग्रस्ताला न्याय देण्यासाठीचा उठाव हा तेव्हाच मावळून जातो व जर अत्याचार ग्रस्त स्त्री अथवा पुरुष ही मोठ्या जात समूहातील असेल तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज, उठावही मोठ्या प्रमाणात होतो. पण जातीवरून अन्यायग्रस्तांना मदत करणे हा सुद्धा एक प्रकारचा भेदभाव आहे. कारण गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगार हा शेवटी कोणत्याही जातीचा असेल तर तो गुन्हेगारच असतो. माणुसकीच्या दृष्टीकोनातून अत्याचारग्रस्तांचा विचार व्हायला पाहिजे पण तसे होताना आजकाल दिसत नाही.
आज वाढलेली झुंडशाही व पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर समजलेल्या शहरात तसेच इतर महानगरात ही आजकाल कोयता गँग च्या उद्रेकाची चर्चा होते त्यात अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी जात आहे. त्या झुंडशाहीला गुन्हे करताना थोडीशीही कायद्याची भीती अथवा धाक वाटू नये, मोटार वाहन चालवणे नियमांची पायमल्ली होऊन कमी वयातील मुले रस्त्याने सुसाट वाहणे चालवून स्वतःच्या जीवाबरोबर इतर निष्पांचाही बळी घेत आहेत. यात आई-वडिलांचेही मुलांप्रती फाजील अति लाड होत आहेत, त्यातूनच मुले बिघडत आहेत.
माणुसकीचे संस्कार हे घरातूनच प्रभावीपणे देण्यामध्ये पालक अपयशी ठरत आहेत कारण आज संयुक्त कुटुंबा ऐवजी
नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबाचे स्थलांतर होत आहे व त्यातूनच विभक्त कुटुंबे निर्माण झालेली आहेत. त्या बहुतांशी विभक्त कुटुंबात लहान मुलांना संस्कार करण्यासाठी त्यांचे आजी, आजोबा सोबत नसून एक तरी गावाकडे किंवा वृद्धाश्रमात आहेत. त्यामुळे सुसंस्कार करण्यासाठी ना पालकांना वेळ, ना सोबत आजी आजोबा. व एखाद्या कुटुंबात असले तरीही त्या वृद्धांना बहुतांश ठिकाणी अपमानास्पद जगावे लागते. वृद्ध आई-वडील बोजा समजला जात असेल तर नवीन पिढी काय संस्कार घेईल व त्यांच्यात काय इतरांप्रती माणुसकी, दया, प्रेम, राहील.
निकोप, सुदृढ, व चांगल्या, आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी प्रथमतः प्रत्येक समाज घटकाचे कर्तव्य हे आहे की, मुलांमध्ये प्रेम, आपुलकी, दया, क्षमा, शांती यांची रुजवणूक करणे. हे मूल्य घराघरातून शाळेतून प्रभावीपणे रुजली तर निश्चितच माणसातली हास पावत चाललेली माणुसकी थांबेल अन्यथा माणुसकी शून्य माणसांचा राक्षसी कळप निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
लेखक
कांबळे गौतमकुमार नागनाथराव
जि प कें प्रा शा कासारखेडा ता. जि. लातूर
मो नं 9822172818
0 Comments