किरकोळ वादातून निलंगा तालुक्यात शिक्षकाचा खून
डॉ. आंबेडकर जयंतीत झाला होता किरकोळ वाद
निलंगा : निलंगा तालुक्यातील औंढा गावात शुक्रवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक निघाली. रात्री ८ च्या सुमारास औंढा येथील दोन समाजात किरकोळ वाद झाला. तो वाद आपसात मिटविण्यात आला होता, परंतु
मिरवणुकीदरम्यान तरुणांत किरकोळ वाद झाला, परंतु याचे
पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. परंतु दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी औंढा येथील दत्तू मारुती गायकवाड याने हा वाद पुन्हा उकरून काढत अजय चौडा, स्वप्निल सूर्यवंशी, अझहर महंमद, आदित्य मोरे, गजेंद्र शिवराज सरवदे सर्व रा. कासार सिरसी व संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, शहाजी गायकवाड तिघे रा. औंढा, ता. निलंगा व इतर काही तरुणांना गावात बोलावून घेतले. त्यांनी यादव बिराजदार, उमाकांत पटवारी आणि इतरांना शिवीगाळ करत मारहाण केली. नंतर ते परतत असताना शेतात काम करत असलेले गुरुलिंग अशोक हासुरे रा. बहुर, ता. निलंगा हे दिसले. कालच्या वादात हासुद्धा होता, असे म्हणत आरोपींनी त्यांना दगडाने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात हासुरे जागीच ठार झाले. हासुरे यांचे काका गुंडाप्पा हासुरे यांच्या तक्रारीवरून कासारसिरसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत शिक्षकाच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई व लहान भाऊ असा परिवार असून तो घरातील कर्ता पुरुष होता.
शेकडो नागरिक पोलीस चौकीत जमले
शिक्षक हासुरे यांचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांना कळताच शेकडो नागरिकांनी कासार सिरसी पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी बंदोबस्त वाढवण्यात आला. आरोपींना अटक केल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गुन्हा दाखल होताच चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनास सुरुवात झाली.
आंबेडकर जयंतीत वाद झाल्याची कल्पना कासार सिरसी पोलिसांना होती. परंतु महापुरुषांच्या जयंती काळात पोलिसांनी कोणतीच काळजी घेतली नाही. पोलिसांनी पुढाकार घेत हा वाद मिटवला असता तर दोन समाजात तेढ निर्माण झाले नसते आणि दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडलीच नसती, अशा भावना नागरिका द्वारे उमटत आहेत.
0 Comments