हमीभावाने सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची करडी नजर; खरेदी केंद्रांच्या तपासणीसाठी तालुकास्तरावर पथके गठीत
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आदेश
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : जिल्ह्यात सुरु असलेल्या हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रांवर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरीय पथके गठीत करण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात नाफेडच्यावतीने चार संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. विविध ५२ खरेदी केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे. या खरेदीमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, शेतकरी यांनी पालकमंत्री ना. भोसले लातूर दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे मांडल्या. या तक्रारींची दखल घेवून पालकमंत्र्यांनी खरेदी केंद्रांच्या नियमित तपासणीसाठी पथके नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी तातडीने कार्यवाही करून तालुकास्तरीय पथके गठीत करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
या पथकामध्ये पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक, तालुका कृषि अधिकारी, नायब तहसीलदार व सहायक निबंधक सहकारी संस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके दररोज अचानकपणे प्रत्येक खरेदी केंद्रावर चार वेळा भेट देवून तेथील सोयाबीन खरेदी प्रक्रियेची तपासणी करणार आहेत. राज्य शासनाने सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली असून या काळात सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता होवू नये, नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीनच खरेदी केली जाईल, यासाठी तालुकास्तरीय पथके उपाययोजना करतील. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
*****
0 Comments